यशासाठी.... सर्व काही




                 यशासाठी.... सर्व काही

आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वांनाच यशस्वी व्हायचं असतं, पण यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माहीत नसतो.. मग लोक शॉर्टकट च्या नादात स्वतःचा वेळ पैसा याचे नुकसान करून बसतात. म्हणून जीवनाचा प्रवाह कोणत्या दिशेला न्यायचा हे आपणच ठरवायचे असते. शेवटी काय तर यशाच्या मार्गाला शॉर्टकट नसतो. काही लोक म्हणतात यश हे तुमच्या नशिबावर अवलंबून आहे तर असे नाही जीवनाचे यश हे तळहाताचा रेषेवर नसून मनगटात आपल्या कष्टावर अवलंबून आहे.

" कुंडलीतल्या ग्रहताऱ्यांची नको तपासू स्थान गती
  मनगट ज्याचे कणखर त्याचे नशीब नाही तळहाती
  शिंपण करता घामाचे तारा नशिबाचा चमचमतो "

एखाद्या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करणे हेच यशाचे रहस्य आहे. आपल्या प्रयत्नात सातत्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्यातच कर्तुत्व आहे आणि असाध्य ते साध्य करण्याची जिद्द बाळगली तर यश नक्कीच मिळते.... 
                      √ यशाचे २१ मूलमंत्र

१. धैर्य, प्रयत्न, कष्ट,  ही यशाची त्रिसूत्री आहे. नेहमी लक्षात ठेवावे.
२. एखाद्या गोष्टीचा ध्यास व त्याचा अभ्यास यातूनच आयुष्यात काही साध्य होऊ शकते.
३. नेहमी आपल्या प्रयत्नांवर श्रद्धा ठेवावी.
४. ध्येय जेवढे महान तेवढा त्याचा मार्ग खडतर असतो.
५. आपल्या स्वतःच्या दोषांकडे नेहमी लक्ष ठेवा तरच सुधारण्याची संधी मिळते.
६. कार्य मनापासून केले असता ते कार्य सर्वोत्तम होतेच.
७. दैवावर हवाला ठेवून दुबळे बनवू नये प्रयत्न अवश्य हवे.
८. मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण हवे म्हणजेच पराक्रम हा न बोलता करावा मगच तो सांगावा.
९. नेहमी सकारात्मक विचार करावा. सकारात्मक विचारात कोणत्याही संकटाला तोंड द्यायची शक्ती  असते, सकारात्मकता कार्याची अर्ध पूर्ती आहे..
१०. कुमार्गी असलेले मन एखाद्या शत्रूपेक्षाही स्वतःची जास्त हानी करून घेतो.
११. प्रयत्न हा परिस असून त्याच्या सहाय्याने वाळवंटाचे नंदनवन सुद्धा करता येते.
१२. कोणत्याही यशप्राप्तीसाठी ज्ञान हे हवच..आपल्याला जितकी अधिक माहिती तितकीच चुका होण्याची शक्यता कमी असते.
१३. यशस्वी व्यक्ती आळसाला आपल्या आयुष्यात कधीही स्थान देत नाही, आळसातून दारिद्र्याचा जन्म होतो. आळस इतका सावकाश प्रवास करतो की दारिद्र्य त्याला लगेच गाठते.
१४. अनुभवाचे वजन कल्पनेच्या शतपट असते. सतत कार्यमग्न रहावे त्यातूनच अनुभव साठा वाढतो.
१५. लर्निंग अटीट्युड हवा. सर्वच घटना काही ना काही शिकवत असतात पण नेहमी शिकण्याची तयारी हवी.
१६. कष्टाच्या खडकाखाली पाण्याचा झरा असतो.
१७. कृती मोठी असावी पण विचार बारकाईने करावा.
१८. आज केलेल्या त्यागातून कर्मातूनच उद्याचा उज्वल काळ निर्माण होतो.
१९. संकटांना कधी घाबरायचं नाही, अधिक संकटे येणारा क्षण सोबत विजय घेऊन येतच असतो आणि ज्याच्याजवळ आत्मविश्वास आहे तो अंधारातूनही मार्ग काढतो.
२०. एखाद्या गोष्टीची  अाशा बाळगण्यापेक्षा ती मिळवण्याची जिद्द बाळगावी.
२१. हेल्थ इज वेल्थ. शरीराचे, मनाचे आरोग्य उत्तम ठेवले तरच कोणत्याही कार्याला गती येईल.



..मोहिनी😊

      

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

करिअर बाबतचे निर्णय घेताना..

आजच्या तरुणांसाठी..